अस्मिता आत्माराम साळुंखे यांची रायगड जिल्हा महिला अध्यक्षा म्हणून नियुक्ती – अजय पडवळ

खोपोली : बेधडक महाराष्ट्र
मराठा क्रांती स्वराज्य संघटनेच्या वतीने सौ. अस्मिता आत्माराम साळुंखे यांची रायगड जिल्हा महिला अध्यक्षा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही माहिती संघटनेचे पदाधिकारी अजय पडवळ यांनी दिली असून त्यांच्या नियुक्तीमुळे महिला सक्षमीकरणाच्या कार्याला नवी दिशा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
या नियुक्तीबाबत अधिक माहिती देताना सांगण्यात आले की, मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले, राष्ट्रीय अध्यक्ष विजयराव कदम, राष्ट्रीय सरचिटणीस प्रदीपभाई मोरे, राज्य अध्यक्ष गुरुनाथ यशवंतराव, राज्य सरचिटणीस प्रकाशराव चव्हाण, राष्ट्रीय मीडिया अध्यक्ष अभिजित दरेकर तसेच राष्ट्रीय रोजगार उद्योग विभाग अध्यक्ष अजय तिडके यांच्या सूचनेनुसार ही निवड करण्यात आली आहे. मुंबई प्रदेश महिला अध्यक्षा सौ. आरती बबनराव दळवी यांनी अधिकृतरित्या सौ. साळुंखे यांच्या नियुक्तीची घोषणा केली.
सौ. अस्मिता साळुंखे या खालापूर तालुक्यातील खोपोली परिसरातील भानवज, कारमेल स्कूलजवळील रहिवासी असून त्यांनी विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. समाजातील महिलांच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला असून महिलांच्या हक्कांसाठी त्या सक्रियपणे कार्यरत आहेत.
त्यांच्या कार्याचा आढावा घेतला असता, त्या माँ दुर्गाशक्ती सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा म्हणून कार्यरत असून या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. तसेच महिला अत्याचार विरोधी समिती रायगडच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
याशिवाय, त्या रॉयल म्युझिकल दुर्गाशक्ती कलामंचच्या निर्माती असून सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. खोपोली पोलीस महिला सुरक्षा समितीच्या सदस्या म्हणून त्यांनी महिला सुरक्षिततेसाठी योगदान दिले आहे. तसेच सह्याद्री विद्यालय, शिळफाटा येथे सदस्या म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
पत्रकारितेच्या क्षेत्रातही त्यांचा सहभाग उल्लेखनीय आहे. त्या रायगड पोलीस साप्ताहिक तसेच खोपोली टाइम्सच्या प्रतिनिधी म्हणून कार्यरत राहिल्या आहेत. यामुळे सामाजिक प्रश्नांबाबत जनजागृती करण्यास त्यांना मोठी मदत झाली आहे.
राजकीय क्षेत्रातही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अध्यक्षा म्हणून तसेच काँग्रेस आय खोपोली शहर सचिव म्हणून त्यांनी जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यांच्या या विविधांगी अनुभवामुळे त्यांची रायगड जिल्हा महिला अध्यक्षा म्हणून निवड ही योग्य असल्याची भावना व्यक्त होत आहे.
सौ. साळुंखे यांच्या नियुक्तीमुळे रायगड जिल्ह्यातील महिलांच्या प्रश्नांना अधिक बळकटी मिळेल आणि संघटनेचे कार्य तळागाळापर्यंत पोहोचेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महिला सक्षमीकरण, सामाजिक न्याय आणि संघटन वाढीस चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे.




