खालापूरचे तहसीलदार अभय चव्हाण यांना पितृशोक; भूविकास बँकेचे माजी शाखाधिकारी शिवाजीराव चव्हाण यांचे निधन

उमरगा: बेधडक महाराष्ट्र
मुळज (ता. उमरगा) येथील मूळ रहिवासी आणि नोकरीनिमित्त उमरगा येथे स्थायिक झालेले भूविकास बँकेचे माजी शाखाधिकारी शिवाजीराव दत्तात्रय चव्हाण (वय ७९ वर्षे) यांचे शुक्रवार, दिनांक २२ मे २०२६ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने चव्हाण परिवारासह मुळज व उमरगा परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ते खालापूर (जि. रायगड) चे तहसीलदार अभय चव्हाण यांचे वडील होत.
शिवाजीराव चव्हाण यांनी भूविकास बँकेमध्ये शाखाधिकारी म्हणून अत्यंत प्रामाणिकपणे आणि निष्ठेने सेवा बजावली होती. त्यांच्या मनमिळावू आणि अजातशत्रू स्वभावामुळे त्यांनी समाजात मोठा मित्रपरिवार जोडला होता. तसेच त्यांची ईश्वरभक्तीवर दांडगी श्रद्धा होती. त्यांच्या जाण्याने एक मार्गदर्शक आणि सुहृद व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
त्यांच्या पार्थिवावर उमरगा येथे दि२३/०५/२६ रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी सामाजिक, राजकीय, प्रशासकीय आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने अंत्यदर्शनासाठी उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी प्रभावती शिवाजीराव चव्हाण, मुलगे अभय चव्हाण (तहसीलदार, खालापूर) व सुरज चव्हाण, तसेच भाऊ, बहिणी, सुना आणि नातवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे.
गुरुवारी ‘गोड जेवण’ कार्यक्रम
दिवंगत शिवाजीराव चव्हाण यांच्या दुःखद निधनानिमित्त त्यांचा ‘गोड जेवणाचा’ (उत्तरकार्य) कार्यक्रम गुरुवार, दिनांक ३ जून २०२६ रोजी त्यांच्या उमरगा येथील राहत्या घरी (निवासस्थानी) होणार असल्याची माहिती चव्हाण परिवाराच्या वतीने देण्यात आली आहे.




