जय अंबे भवानी माध्यमिक विद्यालयात शालेय साहित्य वाटप
श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र व अन्नछत्रालय, पळसदरीचा सामाजिक उपक्रम

कर्जत : बेधडक महाराष्ट्र
भिसेगाव, कर्जत येथील जय अंबे भवानी माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना अडचणी येऊ नयेत, या उद्देशाने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र व अन्नछत्रालय, पळसदरी यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचे स्वागत केले.
या उपक्रमाचे आयोजन अध्यक्ष विक्रांत दरेकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी संस्थेचे सदस्य दत्तात्रय दरेकर, विठ्ठल सुर्वे, जीवन थोरवे तसेच विद्यालयातील शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
शालेय साहित्य वाटप करताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. शिक्षणाच्या प्रवासात छोट्या-छोट्या मदतीचेही मोठे महत्त्व असते. विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्य मिळाल्यामुळे त्यांच्या शैक्षणिक गरजा काही प्रमाणात पूर्ण होण्यास मदत होणार आहे. समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देणे, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे आणि सामाजिक बांधिलकी जपणे या उद्देशाने श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र व अन्नछत्रालय, पळसदरीकडून विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
संस्थेच्या वतीने दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, शाळांना आवश्यक वस्तू तसेच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहकार्य केले जाते. समाजातील प्रत्येक घटकाने आपल्या परीने गरजू विद्यार्थ्यांना मदत केल्यास शिक्षणाची वाट अधिक सुकर होऊ शकते. आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याच्या शिक्षणात अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.
जय अंबे भवानी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शालेय साहित्य मिळाल्याबद्दल श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र व अन्नछत्रालय, पळसदरीच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून समाजसेवेचा आदर्श निर्माण केल्याबद्दल संस्थेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.




