Uncategorized

बडोदा-रत्नागिरी विशेष रेल्वे कायमस्वरूपी करण्याची मागणी

पंतप्रधानांच्या बडोदा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांना आवेदन; महाराष्ट्रीयन समाजाच्या वतीने प्रश्न मांडणार

बडोदा, प्रतिनिधी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात येणारी बडोदा ते रत्नागिरी विशेष रेल्वे कायमस्वरूपी सुरू करण्यात यावी, अशी मागणी अखिल महाराष्ट्र युवक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात आज बडोदा जिल्हाधिकारी यांना आवेदनपत्र सुपूर्द करण्यात आले.

भारताचे पंतप्रधान दि. ८ सप्टेंबर २०२६ रोजी बडोदा येथे येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या भेटीसाठी तसेच महाराष्ट्रातील नागरिकांच्या विविध मागण्या मांडण्यासाठी हे आवेदनपत्र देण्यात आले. बडोदा शहर व परिसरात मोठ्या संख्येने महाराष्ट्रीयन समाज वास्तव्यास असून, गणेशोत्सव, सण-उत्सव आणि विविध कौटुंबिक कारणांसाठी महाराष्ट्रात जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे बडोदा ते रत्नागिरी दरम्यान विशेष रेल्वे सेवा सुरू होणे ही प्रवाशांसाठी महत्त्वाची सुविधा ठरणार आहे.

गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाकडून बडोदा-रत्नागिरी विशेष रेल्वे सुरू करण्यात येणार आहे. मात्र ही सेवा केवळ सणापुरती मर्यादित न ठेवता वर्षभर नियमित आणि कायमस्वरूपी स्वरूपात सुरू करण्यात यावी, अशी मागणी अखिल महाराष्ट्र युवक संघटनेने केली आहे.

या मागणीसाठी अखिल महाराष्ट्र युवक संघटना बडोदा अध्यक्ष विजय जाधव तसेच महाराष्ट्रीयन समाजातील प्रमुख आगेवान पुढाकार घेणार आहेत. बडोदा शहरात वास्तव्यास असलेल्या महाराष्ट्रीयन नागरिकांना कोकण व महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषतः गणेशोत्सव, दिवाळी, उन्हाळी सुट्टी आणि इतर सणांच्या काळात रेल्वेगाड्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे बडोदा-रत्नागिरी विशेष रेल्वेला कायमस्वरूपी स्वरूप मिळाल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळू शकतो.

बडोदा आणि महाराष्ट्र यांच्यातील सामाजिक, सांस्कृतिक आणि व्यावसायिक संबंध लक्षात घेता या रेल्वेसेवेची आवश्यकता असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. नियमित रेल्वे उपलब्ध झाल्यास महाराष्ट्रात ये-जा करणाऱ्या विद्यार्थी, कामगार, व्यावसायिक, नोकरदार तसेच कुटुंबांना मोठी सोय होणार आहे. यामुळे प्रवासाचा वेळ आणि आर्थिक खर्चही कमी होण्यास मदत होईल.

यासंदर्भातील आवेदनपत्र जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द करून ही मागणी शासन व रेल्वे प्रशासनापर्यंत पोहोचविण्याची भूमिका संघटनेने घेतली आहे. पंतप्रधानांच्या बडोदा दौऱ्याच्या निमित्ताने महाराष्ट्रीयन समाजाच्या या महत्त्वाच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळावा आणि बडोदा-रत्नागिरी रेल्वे सेवा कायमस्वरूपी सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

बडोदा येथील महाराष्ट्रीयन समाजातील प्रमुख व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते आणि युवक संघटनेचे पदाधिकारी या मागणीसाठी एकत्रितपणे प्रयत्न करणार असून, रेल्वेसेवा कायमस्वरूपी सुरू होईपर्यंत पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!