मराठी चित्रपटसृष्टी बचाव आंदोलनाचे ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन


ठाणे : बेधडक महाराष्ट्र
मराठी चित्रपटसृष्टीसमोरील विविध प्रश्न आणि कलाकारांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ‘मराठी चित्रपटसृष्टी बचाव आंदोलन’ महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
आंदोलनाचे आयोजक तसेच कलाकार प्रसाद इंगवले आणि अक्षय क्षीरसागर यांनी अवघ्या दहा दिवसांत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील कलाकारांना एकत्रित करत आंदोलनाची व्यापक आखणी केली. होतकरू, हौशी तसेच काम करण्याची आणि वेळ देण्याची तयारी असलेल्या कलाकारांना या उपक्रमात सहभागी करून घेण्यात आले.
याच पार्श्वभूमीवर १ सप्टेंबर २०२६ रोजी ठाणे येथे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांची दुपारी १२ वाजता भेट घेऊन मराठी चित्रपटसृष्टीच्या प्रमुख मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी डॉ. दिगंबर तायडे, राजू माने पाटील, अमोल निरगुडे, चंद्रकांत मोरे, दिग्दर्शक अतुल कुडवे, धर्मेंद्र पाटील यांच्यासह अनेक कलाकार उपस्थित होते.
हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीच्या प्रश्नांसाठी संघटितपणे लढा देण्याचा निर्धार यावेळी कलाकारांनी व्यक्त केला.




