बडोदा–रत्नागिरी स्पेशल ट्रेन कायमस्वरूपी सुरू करण्याची मागणी
अखिल महाराष्ट्र युवक संघटनेचे बडोदा रेल्वे DRM यांना निवेदन; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार


बडोदा : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बडोदा रेल्वे डिव्हिजनकडून बडोदा ते रत्नागिरी दरम्यान विशेष रेल्वे सुरू करण्यात आली आहे. मात्र, कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता ही विशेष रेल्वे केवळ गणेशोत्सवापुरती मर्यादित न ठेवता कायमस्वरूपी सुरू करण्यात यावी, अशी मागणी अखिल महाराष्ट्र युवक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत आज अखिल महाराष्ट्र युवक संघटनेचे अध्यक्ष श्री. विजय श्रीपत जाधव तसेच महाड-पोलादपूर तालुक्यातील मराठा समाजातील २५२ गावांचे अध्यक्ष यांच्या वतीने बडोदा रेल्वे विभागाच्या DRM यांना निवेदन देण्यात आले.
गणेशोत्सव हा कोकणातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण असून, या काळात मुंबई, गुजरात तसेच इतर राज्यांमध्ये नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणासाठी वास्तव्यास असलेले हजारो नागरिक आपल्या गावी परततात. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात रेल्वे, बस आणि खासगी वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात ताण निर्माण होतो. विशेषतः गुजरातमधील बडोदा व परिसरात वास्तव्यास असलेल्या कोकणवासीयांना गणेशोत्सवासाठी रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग आणि परिसरात येण्यासाठी रेल्वे वाहतूक हा सोयीचा व सुरक्षित पर्याय ठरतो.
बडोदा ते रत्नागिरी विशेष रेल्वे सुरू करण्यात आल्याने कोकणवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, गणेशोत्सव संपल्यानंतरही या मार्गावर प्रवाशांची मोठी गरज असल्याने ही रेल्वे सेवा कायमस्वरूपी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
अखिल महाराष्ट्र युवक संघटनेचे अध्यक्ष विजय श्रीपत जाधव यांनी सांगितले की, बडोदा आणि गुजरात परिसरात महाराष्ट्रातील, विशेषतः कोकणातील नागरिक मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. त्यांना आपल्या मूळ गावी ये-जा करण्यासाठी नियमित रेल्वे सेवा उपलब्ध झाल्यास मोठा फायदा होईल. त्यामुळे बडोदा–रत्नागिरी मार्गावरील विशेष रेल्वेचा कायमस्वरूपी विचार रेल्वे प्रशासनाने करावा, अशी मागणी करण्यात आली.
महाड-पोलादपूर तालुक्यातील मराठा समाजातील २५२ गावांच्या अध्यक्षांनीही या मागणीला पाठिंबा दिला आहे. मोठ्या संख्येने नागरिकांच्या प्रवासाचा विचार करता या मार्गावर कायमस्वरूपी रेल्वे सेवा सुरू झाल्यास कोकणातील नागरिकांना तसेच गुजरातमध्ये राहणाऱ्या महाराष्ट्रातील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
रेल्वे सेवा कायमस्वरूपी झाल्यास गणेशोत्सवाबरोबरच दिवाळी, होळी, उन्हाळी सुट्ट्या, लग्नसमारंभ तसेच इतर कौटुंबिक कार्यक्रमांसाठी कोकणात येणाऱ्या प्रवाशांना मोठी सुविधा उपलब्ध होईल. तसेच रस्ते वाहतुकीवरील ताण कमी होण्यासही मदत होणार आहे.
या मागणीचे निवेदन रेल्वे प्रशासनाकडे सादर करून बडोदा–रत्नागिरी स्पेशल ट्रेन कायमस्वरूपी करण्यासाठी सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी अखिल महाराष्ट्र युवक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. आता रेल्वे प्रशासन या मागणीवर कोणता निर्णय घेते, याकडे कोकणवासीयांचे लक्ष लागले आहे.




